जाणीव प्रतिष्ठान शहापुरचा दिवाळी निमित्त फराळ व भाऊबीज कार्यक्रम आदिवासी पाड्यावर
       ज्यांच्या आयुष्यात प्रत्येक दिवस सारखाच असतो, अशा कष्टकरी आदिवासींसोबत जाणीव प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील पायरवाडी (आदिवली) येथे ४ नोव्हेंबर २०१८ रोजी आदिवासी कुटुंबांसोबत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

        दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पायरवाडीतील कुटुंबांना दिवाळी फराळ, तसेच कुटुंबातील प्रत्येक महिलेला भाऊबीज भेट म्हणून साडीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पायरवाडी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गोड गळ्याने सादर केलेली सुमधुर गीते व पायरवाडीतील महिलांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला पायरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आपल्या हातांनी बनवलेली सुंदर, सुविचारयुक्त भेटकार्डे देऊन सर्वांचे स्वागत केले. या वेळी जाणीव प्रतिष्ठानचे सदस्य कवी प्रा. गोपाळ वेखंडे, रमेश तारमळे, विलास वेखंडे व मधुकर हरणे यांनी आदिवासी जनजीवन, समस्या, परंपरा यावर आपल्या रचना सादर करून काव्यमैफलीला चार चाँद लावले व सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.


     २००९मध्ये स्थापन झालेले जाणीव प्रतिष्ठान म्हणजे सामाजिक जाणिवेचे, बांधिलकीचे दुसरे नाव आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या गरजा ओळखून शैक्षणिक साहित्य वाटप, संपूर्ण तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या यशस्वी, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याच्या उदात्त हेतूने कौतुक सोहळ्याचे आयोजन असे कार्यक्रम करणाऱ्या जाणीव प्रतिष्ठानच्या पन्नास सदस्यांपैकी नव्वद टक्के सदस्य गुणी कलावंत शिक्षक आहेत. त्यामुळे आपल्यातील कौशल्ये, सुप्त गुण मुलांपर्यंत कसे पोहोचवता येतील, त्यांचा उपयोग तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल, या सर्व गोष्टींचे वर्षभराचे नियोजन जाणीव प्रतिष्ठान करत असते. त्यानुसार वर्षभर कार्यक्रमांची प्रसंगानुरूप आखणी केली जाते.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव भगवान वरकुटे व ज्येष्ठ सदस्य अरुण पाटील यांनी केले.
       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पांढरे, हरिश्चंद्र भोईर, जगदीश झिंजाळ, संजय भोईर, हरिश्चंद्र ल भोईर, निवृत्ती दांडकर, किशोर दिनकर अशा सर्वच सदस्यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पायरवाडी शाळेचे वरिष्ठ शिक्षक सुनील रिकामे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Comments

  1. आपण हाती घेतलेले कार्य सतत तेवत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो

    ReplyDelete
  2. 'या स्तुत्य उपक्रमाचे करावे तितके कौतुक कमी आहे, असं कार्य करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!'💐

    ReplyDelete
  3. खूपच छान उपक्रम

    ReplyDelete

Post a Comment